महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण – काका कोयटे,अध्यक्ष.
कोपरगाव : अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी सहकारी संघ ज्याप्रमाणे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंडाच्या आधारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देते, त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या हमीद्वारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक श्री. विद्याधरजी अनास्कर यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/08/img_20220827_1533304073727893284014651.jpg)
या योजनेबाबत बोलताना काका कोयटे म्हणाले की, भारतातील नागरी सहकारी बँकेची ज्याप्रमाणे रिझर्व बँक ऑफ इंडिया ही शिखर बँक आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक समजली जाते. त्यामुळे या ठेव संरक्षणाला अधिकृत दर्जा प्राप्त होणार आहे. तसेच सध्या ठेव संरक्षणाची रक्कम ही १ लाख रुपयांपर्यंत आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/08/IMG-20220804-WA0001.jpg)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. नाम. श्री. अतुलजी सावे तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नाम. श्री. भागवतजी कराड, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. प्रवीणजी दरेकर यांच्यासह माजी अर्थ राज्यमंत्री श्री आनंदराव आडसूळ, महाराष्ट्र राज्य सहकारी पत संस्था फेडरेशनचे संस्थापक श्री वसंतराव शिंदे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व संस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य सहकारी पत संस्था फेडरेशनचे संचालक श्री चंद्रकांत वंजारी तसेच संचालक श्री लक्ष्मण पाटील व सर्जेराव शिंदे उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री.राजुदास जाधव व महासचिव डॉ. शांतीलाल सिंगी म्हणाले की, महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांचे मोठे झाले आहे. तथापि सदर पतसंस्थांना बँकेचा बँकिंग परवाना नसल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या ठेवीदारांना संरक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेक ठेवीदार पतसंस्थांकडे ठेवी ठेवण्याबाबत संभ्रमावस्थेत असतात. परंतु आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षणाची हमी दिल्याने पतसंस्थांची विश्वासाहर्यता वाढण्यास व पर्यायाने पतसंस्थांच्या ठेवींमध्ये वाढ होण्यास मदत होईल.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/07/img-20220727-wa00168388577728625172942.jpg)
राज्य पतसंस्था फेडरेशनचे खजिनदार श्री दादाराव तुपकर व उपकार्याध्यक्ष श्री सुदर्शन भालेराव म्हणाले की गेली अनेक वर्षापासून राज्य पतसंस्था फेडरेशन करीत असलेली मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक श्री विद्याधर जी अनासकर यांनी मान्य केल्यामुळे आता पतसंस्थांची विश्वासाहर्याता देखील वाढीस लागेल. त्यामुळे पतसंस्थांनी देखील आता जबाबदारीने वागण्याची गरज आहे.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/07/Adv-Vighnaarta.jpg)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्री अजित देशमुख या योजनेबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की सहकारी पतसंस्थांनी आपल्या एक लाख रुपयापर्यंत ठेवींची एकूण रक्कम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत गुंतवायची आहे या गुंतवणुकीवर सात टक्के इतका परतावा देखील देण्यात येईल त्यामुळे सहकारी पतसंस्थांचे कोणत्याही प्रकारे नुकसान न होता ठेवींना संरक्षण मिळणार आहे.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/07/Adv-jyoti-4.jpg)
अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी सहकारी संघाच्या वतीने गेली १० वर्षे ही योजना अहमदनगर जिल्ह्यात स्थैर्य निधी सहकारी संघ यशस्वीपणे राबवित आहे. याच धर्तीवर आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याने सहकारी पतसंस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे मत अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी सहकारी संघाचे अध्यक्ष श्री.सुरेश वाबळे व उपाध्यक्ष श्री.वसंत लोढा यांनी व्यक्त केले.
![](https://www.nirbhidkopargaon.in/wp-content/uploads/2022/07/Adv-samata-5.jpg)
प्रसंगी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी आभार व्यक्त केले.